सूर्यनारायणाच्या परिवर्तनाचा विचार संक्रांतीमध्ये केला जातो. मात्र, मनाच्या परिवर्तनाच्या दृष्टीनेदेखील ह्या संक्रांतीचा एक वेगळा विचार आपण करू शकतो.
रुपारेल महाविद्यालयाचे तत्कालीन प्राध्यापक श्री. केशव विष्णू बेलसरे सर (तर्कशास्त्र, तत्वज्ञान, मानसशास्त्र ह्या तीनही विषयातील प्रचंड अभ्यास) हे एका संक्रांतीला त्यांचे गुरु गोंदवलेकर महाराज ह्यांच्याशी काही विषयावर चर्चा करत होते. तेव्हा गोंदवलेकर महाराज फार मार्मिकपणे म्हणाले: संक्रांत ह्याचा अर्थ “संक्रांत= सं+क्रांत” क्रांती म्हणजे ओलांडून जाणे. क्रांती कसली?? तर ती मनाची क्रांती. जे मन काळजीने, भीतीने, वासनेने व्यापलेले आहे त्याला ओलांडून त्याच्या पलीकडील उन्मन अवस्थेत (मनाची उंच अवस्था ) जाणे ह्यास संक्रांत असे म्हणतात.”
जे. कृष्णमूर्ती एकदा असे म्हणाले कि:The only revolution is the inner revolution!
जेव्हा समाजामध्ये एखादी क्रांती होते तेव्हा समाजातील सर्व घटक एकत्र येतात आणि विशिष्ट अशा उद्देशाने/ ध्येयाने एकत्र येऊन कार्य करतात. समोरील परिस्थिती अयोग्य आहे, आपल्याला ह्या परिस्थितीतून आनंद, समाधान, शांतता मिळत नाही ह्याची जाणीव जेव्हा होते तेव्हा त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी, दोन हात करण्यासाठी आणि अन्यायाला विरोध करण्यासाठी समाज एकत्र येऊन नेटाने आपले प्रयत्न करतो तेव्हा त्या प्रक्रियेला “क्रांती” म्हणतात; आणि त्यातूनच त्या समाजाची “पुढची” वाटचाल होते आणि त्या समाजाचा विकास होतो.
तद्वत आपल्या मनाचे आहे. जेव्हा आपले विचार, भावना, वर्तन, स्मृती, दृष्टिकोन, वृत्ती, संस्कार, इच्छा, आकांशा, गरजा (मानसिक), अनुभवातून संपादित केलेले ज्ञान, कल्पना, भाषा इत्यादी मनाच्या घटकांमध्ये जेव्हा विसंगतपणा (dissonance and incongruence ) निर्माण होतो तेव्हा उन्मन अवस्था न येत ते मन एकतर मलून होते किंवा बेताल होते.
अशा बेताल मनाला १. स्वतःच्या अधःपतनाची जाणीव होणे (self-realization / insight) आणि २. स्वतःची खऱ्या अर्थाने ओळख करून घेत असताना स्वतःचा गुण-दोषांसह स्वीकार करून (unconditional acceptance of self ) स्वतःवर प्रेम करणे, ३. स्वतःला समाज आणि मानवी मूल्यांवर आधारित जीवन जगण्यासाठी प्रेरित करणे तसेच इतरांनाही त्यांच्या गुण-दोषांसह स्वीकारणे (unconditional acceptance of others) आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ४. भूतकाळातील दुःखकारक गोष्टी आणि भविष्यातील अनियंत्रित गोष्टींचा (factors out of control) शक्य तितका कमी विचार केल्यास वर्तमानातील कार्यातून मनस्वी आनंद, शांतता आणि समाधानाचा अनुभव घेता येईल (Mindfulness).
सूर्याचे भ्रमण असो किंवा सामाजिक क्रांती असो- एका दिवसात कधीही होत नाही, ती टप्याटप्याने होते किंवा “तिळातिळाने” होत असते, त्याप्रमाणे आपल्यातील मानसिक क्रांती देखील “तिळातिळाने पण नियमित व्हावी”. आपण एकमेकांमध्ये तिळगुळाचे वाटप करतो – कारण आपल्याला इतरांच्या सोबतीची/ सहवासाची गरज असते. सामाजिक ध्येयासोबतच वैयक्तिक ध्येय प्राप्त करताना मानसिक क्रांती होणे हे नितांत आवश्यक आहे.
अशी मानसिक क्रांती करताना आपल्याला आपले मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक, मनोविकारतज्ञ, गुरुस्थानी असलेले शिक्षक, आई-वडील, मित्र, किंवा अन्य कोणीतरी आपली मदत करू शकतील परंतु खरी मदत म्हणजे – “उद्धरावा स्वये आत्मा, खचू देऊ नये कधी ! आत्माचि आपुला बंधु, आत्माचि रिपु आपला!!” (श्रीमद्भग्वदगीता, अध्याय ५, श्लोक ६)
आपला उद्धार आपण स्वतःच करावा, स्वतःला कधीही अधोगतीला जाऊ देऊ नये. प्रत्येकजण स्वतःच स्वतःचाच मित्र आहे तसाच शत्रूही आहे.
आपला उद्धार/विकास/ क्रांती- पुढे जाणे हि खऱ्या अर्थाने संक्रांत आहे. आपल्या सगळ्यांच्या मनाचे “संक्रमण” व्हावे आणि अशी हि संक्रांत आपल्या सगळ्यांना फलदायी होवो हि नम्र प्रार्थना.
– प्रा. तन्मय लक्ष्मीकांत जोशी.
Tags: संक्रांत